Friday, 2 February 2024

तिरोकुंड सुत्त : (चार) भिंतीपलीकडील अदृश्य उपाशी सावल्या

 तिरोकुंड सुत्त  : (चार) भिंतीपलीकडील अदृश्य उपाशी सावल्या 

ह्या लेखात मी तिरोकुंड सुत्त आणि त्यावरील स्पष्टीकरण देत आहे. 

बुद्धाने हितकारी/श्रद्धा  आणि अहितकारी/अंधश्रद्धा  गोष्ट कशी ओळखायला शिकविले ?

हे सुत्त  त्रिपिटकातील खुद्दकनिकायात प्रेतवत्थु (प्रेतवस्तु )  विभागातील आहे. ह्या विभागात भगवंतांनी अकुशल कर्म करुन प्रेतयोनीत गेलेल्या लोकांची व्यथा व दुर्दैवी स्थिती समजावली आहे. अर्थात, यावर अनेकांचा विश्वास बसणे कठीण आहे. तरी पंचतंत्रासारख्या मनोरंजक कथांतुन जसे आपण बोध / सद्गुण  घेतो आणि आपले भले करतो तसे आपण आपले भले साधावे. स्वतः बुद्धांनी कालाम सुत्तात स्पष्टपणे सांगितले आहे कि, "मी सांगतो म्हणुन किंवा ग्रंथांत लिहिले आहे म्हणुन मानु नका. जर सर्व समाजाचे भले होत असेल आणि विद्वानांनी स्वीकारले असेल किंवा तुम्ही स्वतः तपासले असेल तरच ते माना ! नाहीतर एक कथा म्हणुन  एका  आणि सोडून द्या.

आणखीन सांगायचे म्हणजे कॉम्पुटर बनवायचे ज्ञान ५० वर्षांपूर्वी एखाद्याला सांगितले तर अशी वस्तु बनू शकते, यावर कोणी श्रद्धा/विश्वास ठेवला नसता! आज ती वस्तु बघितल्यावरच श्रद्धा/विश्वास बसतो. तरीही वाचकाने कालामसुत्तच लक्षात ठेवावे !!

प्रेतवस्तुची विभागाची ओळख : तुमचे काही  मृत पूर्वज आणि प्रिय मृत नातेवाईक मृत्यूनंतर प्रेतयोनीत जन्मुन खूप दुर्दैवी आयुष्य जगण्याची शक्यता आहे. मृत्यूनंतर प्रेतयोनीत अशीच माणसे जातात ज्यांनी घोर अकुशल कर्म केलेली आहेत. (कर्म सिद्धांतानुसार) तिथे ते स्वतःला घोर शिक्षेच्या संकटांपासून व उपाशी रहाण्यापासून वाचवु शकत नाही. म्हणुन बुद्ध समजावतात, तुम्ही मृत पुर्वज/नातलगांबद्दल (तुमच्यासाठी त्यांनी केलेल्या कामाबद्दल) विनम्र राहुन आणि कृतज्ञता बाळगुन, त्यांची भल्यासाठी आणि तुम्हाला जास्त काळ साथ देईल असे पुण्य/मंगल करण्यासाठी दान देत राहिले पाहिजे.

(तिरोकुंड सुत्त सुरु झाले) 

 तिरोकुंड सुत्त:  त्या भिंतीपलीकडील अदृश्य उपाशी सावल्या

(तिरोकुंड म्हणजे घराबाहेरील)

घराच्या बाहेर किंवा चौकात ते  अदृश्य ( मृत पावलेले पुर्वज/नातेवाईक  ) उभे आहेत! दाराच्या चौकटीत ते उभे आहेत, ते त्यांच्या जुन्या घरी परतण्याच्या प्रयत्नात आहेत. पण स्वतःला आणि कुटुंबाला जेव्हा भरपूर अन्न-पाणी मिळते, तेव्हा कोणीही त्यांना (स्वतःच्या पूर्वजांना) लक्षात ठेवुन धन्यवाद देत नाही. असे  प्रत्येक मनुष्याच्याचे कर्म/स्वभाव (दोष) आहे.

तरी अशा प्रकारे ज्यांना स्वतःच्या मृत पुर्वज/नातेवाईकांबद्दल सहानुभूती वाटते, ते इतरांना वेळेवर योग्य अन्न-पाणी किंवा विविध प्रकारे वेळेवर दान  कृतज्ञतेने देतात. दान देताना असा विचार असतो, कि, "आज आम्हाला आमच्या मृत पुर्वज/नातेवाईकांच्या कष्टामुळे सुख समाधान मिळते आहे. (हे सुंदर छान वस्तूचे दान देताना) आम्ही कृतज्ञतेने  अशी कामना करतो कि, ह्या दानाच्या पुण्याने मृत पुर्वज/नातेवाईक जिथे असोत, तिथे त्यांनाही  योग्य अन्न-पाणी किंवा विविध प्रकारे मदत मिळो. आमचे मृत पुर्वज/नातेवाईक सुखी होवोत!"


आज संयोगाने जे मृत पुर्वज/नातेवाईक इथे अदृश्यरित्या जमले असतील त्यांना विनंती कि, "आम्ही इतरांना दिलेल्या (छान आणि भरपूर अन्न-पाणी किंवा इतर विविध ) दानाबद्दल  तुम्ही (मृत पुर्वज/नातेवाईक) आम्हाला प्रेमाने-कौतुकाने आशीर्वाद द्यावे !! तुम्ही आम्हाला असा आशीर्वाद द्व्यावा कि , "आम्हाला  (मेलेल्या नातेवाईकांना ) विविध गोष्टी सन्मानपूर्वक दान करणाऱ्या ह्या जिवंत नातेवाईकांना सुख-शांती व दीर्घायुष्य लाभोज्यांच्यामुळे आम्हाला [ही भेट] मिळाली आहे. आमचा (मृत्युनंतरही) सन्मान झाला आहे. अशा प्रकारे दान करणाऱ्याचे नेहमी खुप मंगल होते! तसे तुम्हा सर्वांचेही होवो!"

हे लक्षात घ्यावे कि, जिवंत असताना केलेल्या अकुशल कर्मामुळे मृत्युनंतर प्रेतयोनी मिळते. ह्या प्रेतयोनीत शेती नसते, गाया-गुरे  नसतात, कुठलाही व्यवसाय नसतो, पैशाचेही व्यवहार नसतात! जे काही दान त्यांचे जिवंत नातेवाईक (इतर गोर-गरीब-गरजु लोकांना) देतात, तेच दान मृत पुर्वज/नातेवाईकांना प्रेतयोनीत मिळते. ते नाही मिळाले कि, हे अदृश्य प्रेतप्राणी खुप व्याकुळ-अशांत-बैचेन होतात. 

जसे पावसाळ्यात डोंगरांवर पडलेले पाणी, झिरपत-झिरपत कळावे बनुन  दरीतुन खालच्या गावांना मिळते, त्याच प्रकारे इथे जिवंत माणसांना केलेली मदत त्या प्रेतयोनीतील मृत पुर्वज/नातेवाईकांना मिळते. 

त्याचप्रमाणे पाण्याने तुडुंब भरलेल्या नद्या जेव्हा समुद्राला मिळुन विशाल बनवतात त्याच प्रकारे,  इथे जिवंत माणसांना केलेली मदत त्या प्रेतयोनीतील मृत पुर्वज/नातेवाईकांना मिळते. 

"भूतकाळात ते माझे  मृत पुर्वज/नातेवाईक, सोबती, मित्रांनी मला दिले, माझ्या वतीने काम केले होते." असे मृत पुर्वज/नातेवाईकांनी केलेल्या उपकारांची जाण ठेऊन कृतज्ञ मनाने आदरपुर्वक दान करतात. अशा प्रकारे त्यांच्या पूर्वजांच्या चांगल्या कामाला चांगल्या कामानेच प्रतिसाद देतात. 


जीवंत माणसे कितीही रडली, दुःख किंवा शोक  केला तरी, कुठल्याच प्रकारे मृतांना फायदा होत नाही. 

पण जेव्हा मृत पुर्वज/नातेवाईकांनी केलेल्या उपकारांची जाण ठेऊन,कृतज्ञ मनाने आदरपुर्वक बुद्धाच्या संघाला दान करतात तेव्हा मृतांना तात्काळ फायदा होतो आणि तो दीर्घकाळ त्यांना सोबत असतो. 

(तिरोकुंड सुत्त समाप्त ) 



स्पष्टीकरण तिरोकुड्ड सुताचे  :

खुप स्वाभाविक आहे कि  असे सुत्त वाचुन विज्ञानाची कास न सोडणाऱ्या बुध्दवाणी बद्दल असंतोष किंवा भीती किंवा दोन्ही वाढतील. म्हणुन अशा प्रकारचे सुत्त खुप विद्वान माणसाने फक्त अशा लोकानांच सांगावे ज्यांनी कालामसुत्त चांगले समजले आहे. ज्यांना कथेतील न पटलेल्या गोष्टी बाजूला ठेवून केवळ सद्गुणांवर लक्ष ठेवुन सद्गुण वाढवणाऱ्यांवर भर असतो. विज्ञान एखादी गोष्ट तेव्हाच स्वीकारते, जेव्हा आपण ती सिद्ध करु शकतो. त्यामुळे आपण प्रेतयोनी सिद्ध ना करता आल्याने, ती जरा बाजूला ठेवुन फक्त सद्गुण घेण्याचा प्रयत्न करूया. 

आजच नाही तर असे बुद्ध काळातही अनेकदा झाले आहे कि, तरुण माणसे आपल्या म्हाताऱ्या आई-बापाला वाऱ्यावर सोडुन देतात. त्यांनी आमच्यासाठी काहीच नाही केले असे बोलतात. आपले पुर्वज कठीण परिस्थितीत कसे जगले, कसे लढले आणि आम्हाला चांगल्या गोष्टींचा वारसा जातं करुन ठेवला, हेही विसरुन जातात. 

पण विद्वान माणसाला हे नेहमी माहिती असते, कि एखाद्या उंच फांदीची उंची, त्या फांदीच्या खाली असणाऱ्या अनेक जुन्या फांदीमुळेच आहे. अगदी त्याचप्रमाणे माझे आजचे सुख हे केवळ माझ्याच नव्हे तर, माझ्या अनेक पिढीच्या मेहनतीमुळे आणि जिद्दी मुळेच आहेत. आई-वडील, काका-काकी/मावशी, मामा-मामी  आणि त्या सगळ्यांचे आई-वडील, यांच्या उपकार्याच्या छायेत माझे सुख भोगीत आहेत. जर पती-पत्नी, भाऊ-बहीण जिवंत नसतील तर त्यांच्या प्रेम-चांगुलपणाने माझे जीवन बहरले आहे. हे जिवंत असोत कि मृत असोत, मी त्यांचा खुप खूप ऋणी आहे. हा विनम्रता, खरेपणा आणि कृतज्ञता हे सद्गुण असलेलाच माणूस हे कबुल करील. 

आणखीन लक्ष दिले तर माझे शिक्षक, शेजारी, अन्न पिकवणारे शेतकरी, पोलीस-सैनिक दल, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक/राजकीय  पुढारी, रिक्षा वाले, ट्रेन-बस बाले, वर्तमानपत्रे-पुस्तक लिहिणारे, मासेमार -मच्छिमार, व्यापारी, डॉक्टर-वार्डबॉय, प्रोफेसर,  न्यायपालिका संघ, अध्यात्मिक संन्यासी, संडास-गटार सफाई कर्मचारी आणि असे असंख्य माणसे हे सर्व कोणत्याही जाती-धर्माचे असु शकतात! ते आज जिवंत असतील किंवा नसतील मी नक्कीच त्यांचा ऋणी आहे आणि राहीन. हा विनम्रता, खरेपणा आणि कृतज्ञता हे सद्गुण असलेलाच माणूस हे कबुल करील.

आता मी हे उपकार कसे फेडु ? हे जिवंत असले तरी अदृश्य आहेत, आणि मृत असले तरी अदृश्य आहेत!! त्यांना माझ्या आनंदात-सुखात कसा सहभागी करू? तर मित्रा ये... हे तिरोकुड्ड सूत्र वाच!!  आणि  नंतर सन्मानपूर्वक, निर्मळ मानाने आणि कृतज्ञतेने उत्तम दान कर! ते इतरांना बुद्धाने सांगितल्या प्रमाणे मिळेल!

आता प्रश्न हा कि बुद्धाच्या संघालाच दान केल्याने ते लवकर आणि जास्त काळ कसे टिकेल ?

लक्षात घ्या सुत्तात संघ हा शब्द आहे, त्यात भिक्षु, भिक्षुणी, उपासक, उपासिका चौघे हि येतात !

एखाद्याला दुसऱ्याला पैसे पाठवायचे असल्यास माणूस एकदम विकसित बैंक बघतो जी ऑनलाईन व्यवहार १-२ सेकंदात करते. मोठं व्याज पाहिजे असेल तर अशी मेहनती विकसित बैंक बघतो जी विचार पूर्वक चांगल्या ठिकाणी, चांगल्या मार्गाने खुप मेहनत करुन गुंतवलेले पैसे वाढवुन देते! बरोबर ना ?

भगवंताचा संघ ( भिक्षु, भिक्षुणी, उपासक, उपासिका) हे अशीच विकसित बैंक आहे. ते स्वतःला दिवस रात्र चांगल्याकामात (सत्य, न्याय, सन्मार्ग, निरंतर व निस्वार्थ लोकसेवा)  गुंतवतात. विचारपूर्वक चांगल्या ठिकाणी, चांगल्या मार्गाने, खुप मेहनत करुन मन शुद्ध करतात, सदाचारी बनतात, विपश्यना ध्यान करीत मनाचा खूप उज्ज्वल विकास साधतात. ते कोणतीही जात-धर्म ना पाहता निस्वार्थ आणि सेवाभावी वृत्तीने लोककल्याण करीतच  ते विकसित गुणवान मानव होतात.  जसे पैशाचे काम एका सजग, उच्च शिक्षित, प्रामाणिक, मेहनती आणि सद्गुणात रमणाऱ्या माणसालाच मिळते, त्याच प्रमाणे भगवंताचा संघ ( भिक्षु, भिक्षुणी, उपासक, उपासिका) हे अशीच विकसित बैंक आहे जी सदासर्वदा मेहनती व कल्याणकारीच कामे करते. त्यामुळे संघाच्या ह्या चारही खांबांचा उचित आदर आणि सत्कार व्हावा .  कां हि कल्याणकारी कामे करताना शील, सत्य, अखंड मैत्रीआणि सहनशीलता ह्या पारमिता पूर्ण केल्यानेच तो माणुस संघाचा भाग बनतो, भले मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असो!! एखादे कर्मकांड केल्याने, विशिष्ट कपडे घातल्याने, विशेष भाषा बोलल्याने किंवा विशेष केस रचना केल्याने नाही!! (संदर्भ : धम्मपद, भिक्षु वर्ग )



नोट : तिरोकुड्ड चा अनुवाद मी खालील इंग्लिश वेबसाईट चा आधार घेऊन केला आहे. ह्या वेबसाईट च्या सौजन्याबद्दल आणि मेहनती बद्दल खुप  खुप धन्यवाद।।

https://www.accesstoinsight.org/tipitaka/kn/pv/pv.1.05.than.html

खूप खूप धन्यवाद !

आशा आहे कि ह्या लेखाने खूप सारे अकुशल विचार किंवा धारणा दूर होतील!


सर्वांचे मंगल होवो!

संबोधन धम्मपथी 

मोबाइल : ९७७३१००८८६ (व्हाटसप )

Monday, 29 January 2024

बुद्धाच्या नावावर अंधभक्ती बुद्ध शिष्यांद्वारे : आत्महत्येमुळे प्रेतयोनी

माझ्या एका सजग मित्र सदाभाऊंनी मला युट्युबवरील एका भन्तेजींचा व्हिडीओ पाठवुन अनेकांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी मत प्रकट करण्यास सांगितले. तो दुर्दैवी व्हिडीओ पाहून तात्काळ हा लेख लिहायला घेतला आहे !

भन्तेजींनी काय सांगितले : ह्या व्हिडियों कथित महास्थवीर विविधआत्महत्येद्वरे मनुष्याला प्रेतयोनी मिळते. मृत्यूपश्चात तो व्यक्ती तिथे बैचेन होतो, आणि मग त्याच्या जिवंत नातेवाईकांना वेगवेगळ्या प्रकारे छळतो. त्यातुन बाहेर पडण्यासाठी बुद्धांनी उपासक उपसिकांना भिक्षु ला ७ बाय १२ चे निवास स्थान व विविध मागण्या पुरविल्या तर अशा प्रेतांपासुन सुटका होते. त्यामुळे भिक्षुना  दान नियमित करीत जावे. तसेच हीच अधिकृत बुध्दवाणी आहे हे समजावण्यासाठी विविध शब्दप्रयोग (भव-अस्रव/सत्यक्रिया) केला आहे व शेवटी गोएन्काजींची मंगल मैत्री ही  दिली आहे. 

माझे  विचार खालीलप्रमाणे : 

सर्वात अगोदर बुद्धप्रणित सेवाभावी, ध्यानरत, आचारणशील  व विद्वान भिक्षु संघाला (भिक्षु , भिक्षुणी, उपासक, उपासिका) मी त्रिवार नमन करतो! त्यांच्याबद्दल आदर व कृतज्ञता ठेवुन हा लेख लिहीत आहे. 

 पहिला मुद्दा : बाबासाहेबांचे विचार 

पुज्य बाबासाहेब आंबेडकरांनी 'बुद्ध व त्यांचा धम्म" ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्रिपिटकातील बुद्ध वाणी ओळखण्यासाठी दोन कसोट्या सांगितल्या आहेत. पहिली कसोटी : बुद्धाने अशी कुठलीही गोष्ट सांगितलेली नाही ज्याने मानवाचे कल्याण होत नाही. दुसरी कसोटी: जी गोष्ट बुद्धी संगत किंवा तर्क संगत नाही, ज्याने कार्यकारण भाव दिसत नाही तो गोष्ठ बुद्धाने सांगितलेली नाही !!

भंतेंजींच्या मुद्द्यांत ह्या दोन पैकी एकही कसोटी त पास होत नाही. याचे स्पष्टीकरण पुढे देत आहे. 

दुसरा  मुद्दा : बुद्धांनी सांगितलेले पुनर्जन्माचे विज्ञान 

ह्या दुर्दैवी व्हिडीओतील भंतेंजींनी सांगितल्याप्रमाणे जर खरंच भुतं असती आणि भुतांना जर इतरांना खरंच त्रास द्यायची शक्ती असती, तर त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या भुतांनी इतर अन्यायी लोकांना दिवस रात्र सतावले  असते !! त्यामुळे  पापी व अबोध राजकारणी, प्रशासन अधिकारी, भ्रष्ट वकील/पोलीस, किंवा विरोधी पक्ष हे सुधरले नसते का? बरे सतावायचेच झालेच तर आपल्याच नातेवाईकांना का सतावतील ? जर त्यांची बौद्ध भिक्षुंवर विश्वासच नसेल तर, हे भतेंजी बोलतात त्याप्रमाणे भिक्षूंना अन्न -वस्त्र व निवारा दिल्यावर त्यांना समाधान व मुक्ती कशी मिळेल ? 

हा सगळं अवैज्ञानिक व अतार्किक धम्माचा अपप्रचार फक्त आणि फक्त भिक्षूंना दान मिळण्यासाठी आहे , हे सुस्पष्ट आहे. ८४,००० बुद्धाची उपदेश वाचुन विपश्यना लोकांना समजावण्याचे काम काही भिक्षु करू लागले आहेत. ते अशा प्रकारचा धम्माचा अपप्रचार करीत नाहीत, कारण मेहनती व ज्ञानी भिक्षूंची काळजी उपासक आपोआप घेताना दिसतात. 

एखाद्याला दानाचे महत्व सांगण्यासाठी त्रिरत्नचा गैरवापर झालेला दिसतो.

त्रिपिटकातील जेवढे ग्रंथ मी वाचलेलं आहेत, त्यानुसार  आत्महत्येने मनुष्य प्रेतयोनीत‌ जातो हे बुद्धांनी शिकवलेले नाही, ना हे त्रिपिटकात आहे, ना हे विपश्यना आचार्य गोयंकाजींनी सांगितलेले आहे.

मृत्यू नंतरची गती समजण्यासाठी मनुष्याला प्रतिसंधी विज्ञानाची माहिती असावी लागते. प्रतीत्यसमुत्पाद (तृष्णा आधारित जन्ममृत्यूचा कार्यकारण भाव)  समजावताना तिथे विज्ञान हा शब्द आला आहे ते विज्ञान हे प्रतिसंधी विज्ञान आहे. हे प्रतिसंधी विज्ञान पाच स्कंधातील विज्ञानापेक्षा वेगळे आहे.


प्रतिसंधी विज्ञानामुळेच प्रत्येकाला जीवनाच्या अंतिम क्षणी, त्याच्याच  जीवनातील एक सर्वात गंभीर संस्कार उफाळुन वर येतो. संस्कार म्हणजे पाली भाषेतील संखार! ह्या मनुष्य जन्मातील एक विशेष गंभीर संस्कार (सर्वोच्च कुशल किंवा अंकुशल‌ कर्माचा अनुभव/प्रभाव) त्या मृत मनुष्याचा नवीन जन्म (३१ लोकातील जन्म, ज्यातील‌ प्रेत लोक एक आहे.) निश्चित करतो.

फक्त आत्महत्येनेच नाही तर, मृत्यू च्या शेवटच्या क्षणी वेळी त्याची मानसिक बेचैनी किंवा मानसिक शांती त्यांची दुर्गती व सद्गती ठरवते. 

खालील उदाहरणांनी हा पूर्ण आत्महत्या व प्रेतयोनीतील जन्मासंबंधातील संबंध हा अकल्याणकारी भाकडकथा आहे हे स्पष्ट होते:
उदाहरण १: एखाद्याने आत्महत्या केली पण, त्यापूर्वी त्याने खुप मंगल कर्म केली असतील तर त्या कर्माच्याच आधारे त्याला मनुष्य, देवलोकात किंवा ब्रह्मालोकात जन्म मिळतो. जसे कि एखाद्याने गोड व शुद्ध पाण्याने भरलेल्या ट्रक मध्ये एक चिमुटभर मीठ टाकले असता, त्या ट्रकातील पाणी खारे होत नाही. 

उदाहरण २: एखाद्याने आत्महत्या केली पण ती इतरांच्या कल्याणाकरिता किंवा इतरांचा जीव वाचविण्याकरिता तर, अशावेळेस त्या मनुष्याचे मन क्षांती पारमितेने भरलेले असते. त्या व्यक्तीचा अंतिम क्षण परम शांतीने व त्यागभावनेने ओतप्रोत असतो . जसे खाली दाखविलेल्या चित्रात  व्हिएतनाम मधील भिक्षु क्वांग डुक  यांनी ११ जुन १९६३ आत्मदहन केले , तिथल्या राजकीय अमानुषतेने दररोज जीवघेणा त्रास सहन करणाऱ्या बौद्ध भिक्षु व उपासकांचा जीव वाचण्यासाठी! दररोज निदर्शने करुनही अन्याय कमी ना झाल्याने, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत मिळावी म्हणुन सर्वात शेवटचा उपाय हाच होता!!





तिसरा  मुद्दा :  आत्महत्या करणाऱ्याची भिक्षुंवर श्रद्धा नसल्यास काय होईल  

हे भंतेजी म्हणतात कि अशा भुतांना  प्रसन्न करण्यासाठी आम्हा भिक्षूंना विविध दान नियमित करावे. त्याने  पुणण्याने हि असंतोषी भुते खुश होतील. पण मग अशा भुतांची भन्तेजींवर श्रद्धा नसल्यास, भंतेजीना दान दिल्यावर ते कसे खुश होतील ? ते नाराजच होतील ना? बरे अशी भुते भन्तेजींनाच दिसतात आणि ती भुते खुश झाल्यावर भन्तेजींनाच कळते, म्हणजे छापा पण माझाच आणि काटा पण माझाच ! 

चौथा मुद्दा : सत्यक्रियेचा अर्थ 
भगवंतांनी महामंगल सुत्तात ३८ मंगल कर्मे सांगितली आहेत. त्यातील दहाव्या अंतऱ्यात  ओळीत खालीलप्रमाणे आहे :
तपोच ब्रह्मचरीयंचं, अरीय सच्चानं दस्सनं ।
निब्बानं सच्च किरियाचं, येतं मंगल मुत्तम ।।

इथे भगवंतांनी सत्यक्रिया करणे हे एक  मंगल सांगितले आहे !! 

भन्तेजींनी काय सांगितले : दुर्दैवाने ह्या व्हिडियों कथित महास्थवीर विविधआत्महत्येद्वरे मनुष्याला प्रेतयोनी मिळाल्यावर, भिक्षुंना नियमित दान दिल्यावर त्या भटकणाऱ्या भुतांना पुन्हा मनुष्य जीवन मिळते आणि भगवंताचं धम्म हि मिळतो. ह्या स्वार्थाच्या हेतुने केलेल्या दानालाच  कथित महास्थवीर 'सत्यक्रिया' म्हणतात. 

सत्यक्रियेचा खरा अर्थ असा कि मी भिक्षुं / ज्येष्ठ धम्म बंधु कडून पंचशीलाची दीक्षा घेतल्यावर शील-सदाचाराचे , समाधीचे किंवा प्रज्ञेचे पूर्ण पालन केले आहे. ह्या कल्याणकारी सत्याने माझे किंवा इतरांचे अमुक एखादे अडलेले मंगल काम पुर्ण होवो! अशा प्रकारे स्वतःच्या धम्माचा स्वतःच्या किंवा इतरांच्या मंगलकामासाठी खर्च/वापर  करणे!!!
सत्यक्रियेचे पहिले उदाहरण :  जेव्हा खुनी डाकु अंगुलीमाल भिक्षु बनला आणि सध्दर्मात प्रगत झाला त्यावेळेस त्याचे मन नेहमी करुणा व सेवाभावाने पुर्ण भरुन असायचे । एकदा त्याला रस्त्यात एक गर्भिणी अवस्थेत वाईट व दुर्दैवी अवस्थेत दिसली. त्याला काय करावे ते ना कळल्याने त्याने  बुद्धाकडे जाऊन मदत मागितली. बुद्ध म्हणाले, "तिच्या समोर जाऊन असे बोल,  'मी जन्मल्यापासुन एकाही प्राण्याची हत्या केलेली नाही!! ह्या सत्याने तुझे कल्याण होवो!" बिचारा भिक्षु अंगुलीमाल  घाबरला कारण त्याने ९९९ लोकांची स्वतःनेच हत्या केली होती. मग तथागताने सांगितले कि, 'सध्दर्मात आल्यापासुन तुझा नवीन जन्म झाला आहे. त्यात तू कोणाचीही हत्या केलेली नाही. म्हणुन  जा व मी सांगितले आहे तसे त्या गर्भिणीला सांग!!' भिक्षु अंगुलीमाल  गेला व त्याने तसे केले ! तो त्या अनोळखी गर्भिणीसमोर सत्य बोलला, तिच्या वेदना जादू केल्याप्रमाणे  तात्काळ थांबल्या!! तिची प्रसुती सुखरूप झाली!! ती व तिचे बाळ निरोगी होते! इतरांच्या कल्याणासाठी सत्य सांगून मंगल क्रिया केली! याला म्हणतात "सत्यक्रिया"!! अंगुलीमाल सुत्ताला गर्भरक्षण सुत्त  सुद्धा म्हणतात. (संदर्भ : अंगुलीमाल सुत्त, मज्झिम निकाय ८६ )

सत्यक्रियेचे दुसरे उदाहरण :  जेव्हा विपश्यना आचार्य सत्यनारायण गोएन्काजींनी भारत सरकार कडे परदेशात विपश्यना शिकविण्यासाठी पारपत्र (पासपोर्ट ) साठी अर्ज केला तेव्हा ते मुळचे ब्रह्मदेशाचे असल्याने त्यांना खुप अडचणी येत होत्या. शिबीराची वेळ जवळ येत होती आणि परदेशात सर्व तयारीही झाली होती. तरीही काही केल्या काही गंभीर नियमांमुळे आणि त्यांचा भाऊ आनंदमार्ग ची साधना शिकवीत असल्याने पारपत्र मिळत नव्हते. तेव्हा गोएन्काजींनी धम्माला आवाहन केले कि, "नवीन जन्मात (विपश्यना शिकल्यापासून)  मी शुद्ध धर्माचा (शील, समाधी, प्रज्ञा) चा नियमाची अभ्यास व बुद्ध वाणीचे  पालन करीत जीवन जगलो आहे. आणि परदेशी धर्मसेवा-लोकसेवेचे वृत्तीतुनच बुध्दवाणी द्यायला जात आहे. ह्या सत्यवचनाने, परदेशी विपश्यना साधकांचे व अनेकांचे कल्याण होवो! आमच्या प्रयत्नांनी त्यांना विपश्यना  साधनेचा लाभ मिळो !" इतरांच्या कल्याणासाठीच, त्यांना बुध्दवाणी मिळण्यासाठीच  गोएन्काजींनी  सत्य सांगून मंगल क्रिया केली! याला म्हणतात "सत्यक्रिया"!!  (संदर्भ : विपश्यना पत्रिका, विपश्यना विशोधन विन्यास )

जो हितकारी सत्य सांगत नाही बोलत नाही, तो सत्यक्रिया करूच शकत नाही!

मी भिक्षुं संघाचे, बाबासाहेबांचे आणि गोएन्काजींचे  आभार मानतो ज्यांनी आम्हाला तथागतांचा मंगल धम्म दिला!! तसेच  प्रिय धम्ममित्र   सदाभाऊ जाधवांचे आभार मानतो ज्यांनी प्रश्न विचारुन धर्म सेवेची चांगली संधी दिली!

खूप खूप धन्यवाद !
आशा आहे कि ह्या लेखाने खूप सारे अकुशल विचार किंवा धारणा दूर होतील!

सर्वांचे मंगल होवो!
संबोधन धम्मपथी 
मोबाइल : ९७७३१००८८६ (व्हाटसप )