विहारातील कार्यक्रमाच्या नियोजनाची मार्गदर्शक तत्वे
विहारात जेव्हा श्रोते जमतात तेव्हा त्यांना विहारातून स्वतःच्या जीवनात परिपुर्णता, सकारात्मकता तसेच स्वतःचे जीवन ध्येयाने, संयमाने, आनंदपूर्वक आणि सजगतेने जगण्याची मार्गदर्शन हवे असते. श्रोत्यांना उत्साही, प्रामाणिक, चतुर, कर्तबगार, आशावादी, संयमी आणि धाडसी व्यक्तींचा सहवास हवा असतो.
तसेच नवीन उर्जा मिळवण्याची धडपड असते, आजच्या घडीला समस्यांचा आढावा व त्यावर उपाय हे नवीन/आधुनिक स्वरूपात सोडवण्यासाठी!!
हे लक्षात ठेवून महामानवांच्या जीवनसंदेशांना आजच्या समस्या सोडवण्यासाठी, नवीन प्रकारची धोरणे समजण्यासाठी व प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ती माणसे विहारांमध्ये आलेली असतात. या आशेला खुप महत्व आहे; कारण माणुस आठवडाभर काम करून परिवाराला सोडुन रविवारच्या दिवशी तिथे सामाजिक (किंवा वैयक्तिक) जबाबदारीच्या भावनेतुन आलेला असतो. त्याच्यामुळे अशा नाजुक व कठीण स्थितीत त्यांना नवचेतना व नवउर्जा देण्याचे; पवित्र पण अत्यंत महत्त्वाचे काम हे विहारातील आयोजक आणि वक्त्यांच्या खांद्यांवरती असते.
दुर्दैवाने अनेक वर्षांपासुन या कामाला पुरेसं यश मिळत नसल्याने तसेच त्याच-त्याच चुका/अपराध आयोजन व वक्ते नेहमीच करीत आल्याने, मी तुम्हाला माझ्या अनुभव आणि ज्ञानाच्या द्वारे काही मार्गदर्शक तत्वे आयोजक आणि वक्त्यांसाठी देत आहे. कृपा करून त्यावर तुम्ही विचार मंथन करावे हि विनंती!
ह्या लेखाचे दोन भाग आहेत :
- भाग १: आयोजकांना विहारातील कार्यक्रमाच्या नियोजनाची मार्गदर्शक तत्वे
- भाग २: प्रवचन/मार्गदर्शन करताना वक्त्यासाठी मार्गदर्शक तत्वे
भाग १: आयोजकांना विहारातील कार्यक्रमाच्या नियोजनाची मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे :
१. विहारातील कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी, सुरुवातीलाच उपस्थित मान्यवरांपैकी एका जबाबदार, निष्णात व प्रामाणिक व्यक्तीला अध्यक्ष म्हणून निवडावे.
२. पालीतील वंदनाबहुतेकांना समजत नसल्याने, पालीतील वंदना जास्तीत जास्त ५-१० मिनिटेच घ्यावी.
३. पुढील वंदना मराठी/हिंदीतून घ्यावी. अशाने लोकांना बुद्ध वाणी समजून नवउर्जा व नवचेतना मिळेल.
४. लोकांना एकाग्रता व खंबीरता मिळवण्यासाठी, पुढे १०-३० मिनिटे आनापान साधनासत्र जरूर घ्यावे.
५. काही दिवसांपूर्वी कार्यक्रमाची रूपरेषा, विशिष्ट विषय, वक्त्याचे नाव व ओळख अशी माहिती घोषित करावी. अशाने श्रोते त्यांच्या आवडत्या व्यक्तीस किंवा विषयाला अनुसरून त्यादिवशी वेळ काढून विहारात येतील.
६.नियोजित रूपरेषा शिस्तीत व सद्भावनेसह ठरवलेल्या वेळेनुसारच घ्यावी. आयोजकांनी अधिक माणसे येण्याची वाट पाहून, वेळेत आलेल्या माणसांच्या वेळेचा दुरुपयोग करू नये किंवा त्यांचा अप्रत्यक्ष अपमानही करू नये.
नोंद: काही माणसे जाणीवपूर्वक उशिरा येतात कारण त्यांना पालीतील वंदना किंवा आनापान साधनेला बसायचे नसते. त्यांना प्रवचन किंवा मनातील प्रश्न विचारायचे असतात. म्हणून कार्यक्रम उशिरा सुरू केला तर अशी माणसं प्रवचनालाही येण्याचे टाळतात. तसेच वेळेत आलेली माणसे कार्यक्रम ३०-६० मिनिटे उशिरा सुरु केल्याने विहारातच येण्याचे टाळतात. अशाने वंदना/प्रवचन आवडणारी किंवा ना आवडणारी; कुठलीच माणसं विहारातच येत नाही.
७. नियोजित अध्यक्ष्यांनी अभ्यासू व विचारवंत वक्त्याची निवड करावी. अध्यक्षांनी जर वक्ता हितकर/उपयोगी व पूर्व-नियोजित विषय करत नसून दिशाहीन व्यर्थ बडबड करत असेल; तर त्याला ५-१० मिनिटात सन्मानपूर्वक थांबवावे किंवा इशारा द्व्यावा. अशाने श्रोत्यांना विहारातील कार्यक्रमाच्या दर्जाची खात्री होते व ते एका फालतु प्रवचनाच्या विहारात येण्याचे थांबवत नाहीत.
८. आयोजकांनी असे विषय निवडावे जेणेकरून श्रोत्यांचे पुढे पैकी दिलेल्या कुठलेही एखाद्या तरी विषयाचे (जसे वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक, बौद्धिक, नैतिक, शैक्षणिक, धार्मिक किंवा अध्यात्मिक) ज्ञान वाढेल किंवा समस्या सोडविण्यास मदत होईल. जो वक्ता आजच्या समस्या सोडवण्यासाठी, योग्य दिशा, मूलभूत कारणे, स्पष्टीकरण किंवा मार्गदर्शन करीत नाही असा वक्ता निरुपयोगी/अपरिपक्व ठरवुन करून त्याला योग्यमार्गदर्शन करावे.
९. विहारातील सुज्ञ, प्रगल्भ व जबाबदार लोकांनी अभ्यासू, मुद्देसूद मांडणी करणाऱ्या, संदर्भासह बोलणाऱ्या, आवाजात नम्रता असणाऱ्या व छान शब्दप्रभुत्व असणाऱ्या वक्त्यांचा शोध घेऊन; त्यांची महिन्याला ठराविक दिवशी (नियोजित उपयोगी विषयाच्या) प्रवचनासाठी ऍडव्हान्स बुकिंग करावी.
१०.कार्यकारी मंडळातील अध्यक्ष/सेक्रेटरीने त्यांच्या दर भाषणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने श्रोत्यांना दान देण्याचे आवाहन करू नये. अशाने श्रोत्यांच्या मनातील अशांती वाढते. त्यापेक्षा कमीत कमी पैशात जनतेत अधिकाधिक नवचेतना व जगण्याची जिद्द कशी तयार होईल अशा प्रकारचं दर्जेदार प्रबोधन कसे होईल हे पहावे!!
११. मंत्रिमंडळातील कमिटीद्वारे समाजावर आर्थिक ताण किंवा कर्जाचा बोजा वाढत असल्यास अशा मंडळींना/कमिटीला उचित समज/मार्गदर्शन द्यावे. हे चालुच राहिल्यास उठाव करुन अशा मनमानी-निस्तेज-अपयशी कमिटी जनतेच्या हितासाठी तात्काळ बरखास्त करावी.अशा कमिटीला पैसे देण्याचे थांबवून समाजातील बेफिकिरी, व्यवहारातील अपारदर्शिता, बेजबाबदारी आणि भ्रष्टाचाराला बळ देऊ नये!
नोंद : आपल्या मुलुंड (पुर्व) मध्ये साधारण साडेतीन लाख रुपयांचा कर्ज/परतफेडीची स्थिती एका बौद्ध मंडळावर आलेली आहे. त्यावरून बोध न घेता, तेच मंडळ नियमितपणे खर्च करीत असुन, रविवारी ती माणसे जनतेकडुन आणखी पैसे मागत आहेत. ही अध्यात्माच्या नावावर आर्थिक अवनती आहे.
१२. कार्यकारी कमिटीच्या कामावर करडी नजर ठेवण्यासाठी बाबासाहेब प्रणित संसदीय लोकशाहीतील विरोधी पक्ष व न्यायालयाप्रमाणेच; साधारण कार्यकारी कमिटीच्या समोर आवर्जून एक विरोधीपक्ष कमिटी आणि (निष्पक्ष व्यक्तींची) न्यायाधीश म्हणुन नेमणूक करावी! हीच खरी संविधानाची जनमानसात अंमलबजावणी होईल!!
१३. कार्यकारी कमिटीने वक्त्यांची प्रवचनाची रेटिंग व श्रोत्यांचा अनामिक प्रतिसाद घेऊन पुढील वेळेस त्या व्यक्तीला प्रवचनासाठी बोलवावे.
१४. बुद्ध विहारातील कमिटीने "तरुण-वर्ग आणि स्त्री-वर्गाची धम्मात रुची वाढवणे", ही आपली एक मोठी जबाबदारी समजावी. अनुषंगाने त्यांनी सुज्ञ, विचारवंत आणि प्रगल्भ उपासक/उपसिकांना ह्या कामासाठी संशोधन करण्यासाठी आग्रहपुर्वक आवाहन करावे.
भाग २: प्रवचन/मार्गदर्शन करताना वक्त्यासाठी मार्गदर्शक तत्वे
१. वक्त्याने दिलेल्या वेळेच्या पाच ते दहा मिनिटे अगोदर बुद्ध विहारात यावे.
२. वक्त्याने नेहमीच पूर्वनियोजित विषयाला अनुसरून प्रवचन करावे.
३. आपण प्रवचन देण्याचे कारण स्वतःचा अभ्यास व मेहनतीचे (अहंकारारूपी) प्रदर्शन नसून बहुजनांचे हित व बहुजनांचे सुख हाच मुख्य उद्देश्य आहे हे नेहमी ध्यानात ठेवावे.
४. अनेक ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी नियोजित विषयाला न्याय द्यावा व श्रोत्यांची ज्ञानाची भूक भागवावी.
५. प्रवचनानंतर प्रश्न-उत्तराच्या सत्रा सठी पाच ते दहा मिनिटे वेळ श्रोत्यांना जरूर द्यावा.
६. प्रवचनाचे मुद्दे मुख्य उद्देश खालील प्रमाणे असावेत:
- श्रोत्यांतील सद्गुणांची वाढ व्हावी.
- श्रोत्यांतील दिवसभरात ती कामांमधील दक्षता( माईंड फुलनेस) व एकाग्रता वाढवावी.
- दोन जाती धर्मातील सलोखा कसा वाढेल याच्याबद्दल मार्गदर्शन करावे.
- प्रवचनातील प्रत्येक मुद्दा श्रोत्यांना किंवा त्यांच्या परिवारातील सदस्यांना उपयोगी व लाभदायक असेल हे पाहावे.
- प्रवचन हे केवळ ऐतिहासिक घटनांचा पाढा नसून सध्याच्या जीवनातील उपयोगात असले उपयोगी असले पाहिजेत. आजचे कुठला तरी प्रश्न सुटला पाहिजे.
- मी काय वाचले हे सांगण्यापेक्षा, जे वाचले त्याची श्रोत्यांना गरज आहे का हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे.
७. श्रोत्यांचे शिक्षण, त्यांचा अभ्यास, त्यांचे हावभाव आणि त्यांचा आर्थिक स्थर, त्यांची बोलीभाषा या आधारे विषयाला अनुसरून सोप्या उदाहरणांची निवड करून विषय समजावून सांगावा.
८. इतरांनी स्वतःचे प्रवचन थांबवण्याऐवजी; श्रोत्यांचे इशारे आलेले झोप कंटाळा यावरून प्रवचन स्वतःच आवरते घ्यावे/संपवावे.
९. अध्यक्षांनी प्रवचन थांबवण्याचा इशारा केल्यास वाईट न वाटता प्रवचन थांबवावे किंवा अध्यक्षांकडे जास्तीत जास्त ५ मिनिटे मागावीत.
१०. प्रवचन करताना एखादा दुसरा स्वतःपेक्षा श्रेष्ठ, अभ्यासू व विचारवंत वक्ता विहारात आल्यास स्व-विवेक जागवत, विनम्रतेने त्या वक्त्यास अध्यक्षांच्या अनुमतीने आमंत्रण प्रवचनासाठी आमंत्रण द्यावे. जास्तीत जास्त लोकांच्या हितासुखासाठी त्यांना श्रेष्ठ वक्त्याचे प्रवचन मिळणे खुप आवश्यक आहे.
१०. प्रवचनानंतर श्रोत्यांकडून त्यांच्या अनामिक प्रतिक्रिया जरूर घ्याव्यात. अशाने स्वतःतील सुधारणेसाठी दिशा स्पष्ट होईल.
११. प्रवचन करताना श्रोत्यांनी हे लक्षात घ्यावे की सर्वोत्कृष्ट प्रवचन हे ते असेल जिथे ब्राह्मण-क्षत्रिय-वाणी- शूद्राति-शूद्र तसेच मुस्लिम किंवा ख्रिश्चन सुद्धा प्रवचनाला ऐकायला येतील; तेव्हा त्यासर्वांची बुद्ध बाबासाहेबांबद्दल श्रद्धा वाढली पाहिजे. असा दर्जेदार प्रवचन देण्याचा प्रयत्न करावा, तेवढी सिद्धी प्राप्त करण्यासाठी जमल्यास दर दिवशी सद्धर्म वाचन, तज्ञांशी चर्चा, उच्चाराचा सराव, विपश्यना सत्र आणि सध्या लोकांची मानसिक अवस्था/जीवनशैली यांचा सर्वावांगिण अभ्यास करावा.
१२. अत्यंत महत्वाच्या दिवशीच्या प्रवचनाच्या तयारीसाठी, एक महिन्यापुर्वी त्या नियोजित वक्त्याकडुन, भाषणाची लेखी प्रत मागवुन घ्यावी. त्यावर सुज्ञ विचारवंतांना अभ्यास करून भाषणाची आजची उपयुक्तता आणि सत्यता तपासावी. काही सुचवायचे असल्यास तात्काळ सुचवावे. त्यानंतरच त्या वक्त्याला ते भाषण करण्याची परवानगी द्यावी. नाहीतर महत्वच्या दिवशी सर्वात जास्त फालतु भाषण देण्याची आपल्या वक्त्यांना व आयोजकांना घाणेरडी सवय आहे.
मला आशा आहे, अशा प्रकारच्या स्पष्ट, सुचक, कल्याणकारी व समयोचीत मुद्द्यांशी तुम्ही सहमत व्हाल. आणि आपल्या जवळच्या विहारात महामानवाने अपेक्षित असलेली अनेक कल्याणकारी प्रवचने आणि योजना जनतेस (कमीत कमी पैसे मागत) जनतेला भीम-बुद्धाच्या उपकारांची जाण ठेवीत वास्तवात आणाल. धम्म सर्वाना बळ देवो!
संबोधन धम्मपथी ( ९७७३१००८८६)
कॉम्पुटर इंजिनियर, त्रिपिटक वाचक, धम्मसेवक
मुंबई, महाराष्ट्र
ईतर संबंधीत लेख : अजाण बौद्ध वक्ते व आयोजक । तिसरा बुद्ध विहार अधिवेशन । सामाजिक सलोखा व बंधुत्व राखुन प्रबोधन